Total Pageviews

Sunday, January 23, 2011

ओढ जीवनाची.....

ओढ जीवनाची.....
जीवनाच्या कित्येक घड्या, एक एक घडी उलगडताना "तिचं" आयुष्यं वेगळं....
उलगडणारी घडी, पुन्हा बसेलच का? - ह्याची शाश्वती नाही.....
पण;
प्रत्येक घडी उलगडताना, उत्सुकता मात्र पराकोटींची!
एका ठिकाणी थांबून राहिलेलं, संथ वाहणारं किंवा अडचणींनी अडलेलं - आयुष्यं प्रिय नसतं!   
हवा खळखळाट!!
उथळ पाण्यासारखा नव्हे- तर हास्याचा- कधी अश्रूंचा....... कधी गप्पांचा  तर कधी गाण्यांचा!!!
आयुष्य 'सुगंधी" आहे...
फक्त ही "जाणीव" जपावी लागते.....
जगणं "वाहत्या"  पाण्याजोगं  असावं....
फक्त ती "गती" जपावी लागते.....

Sunday, January 16, 2011

‘लिहावे नेटके’

मराठीचा ‘गंध’ लावणारे हल्ली बरेच भेटतात. पण अशांना मराठीचा गंध असतोच असं नाही. त्यांनाही ते ठाऊक असतं. ‘अक्षराला हसू नये’ ही वृत्ती आत्मविश्वास नसल्याचं प्रतीक आहे; तर ‘मराठी लिहायची सवय नाही, त्यामुळे ऱ्हस्व-दीर्घ सांभाळून घ्या,’ असं म्हणणं भाषेला कमी लेखणंच असतं. तरीही अशा मराठीचा कैवार घेणाऱ्या शिलेदारांना गमावून तर चालणार नाही.
‘लिहावे नेटके’चा पुस्तकसंच वाचताना तो विद्यार्थी दशेतल्या मुलांबरोबरच ज्यांनी मराठीची हेळसांड केली आहे, अशा लोकांनाही द्यावा, असं पट्कन मनात येतं.
माधुरी पुरंदरेंनी मराठी भाषा नीट लिहिता-वाचता यावी म्हणून अतिशय परिश्रमपूर्वक दोन खंड तयार केले आहेत.
प्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. खंड वगैरे म्हटलं की वाचक आधीच भांबावतो. ही मराठी भाषा शिकवणारी पुस्तकं असली तरी व्याकरण शिकवणाऱ्या जड पुस्तकासारखी नाहीत. चित्रं, फोटो, चौकटी, चिन्हांकित सूचना, अतिशय सोपे गाळलेल्या जागा भरण्याचे स्वाध्याय आणि नेटकी दर्जेदार निर्मिती हे या पुस्तकांचं वैशिष्टय़. पूर्वी ‘हाऊस ऑफ सोविएत कल्चर’च्या वतीने मूळ रशियन पण मराठीत अनुवादित केलेली अशी चित्रमय दर्जेदार पुस्तकं असायची. ‘लिहावे नेटके’चा संच पाहून त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
हा संच ज्योत्स्ना प्रकाशन, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, पुणे आणि सर रतन टाटा ट्रस्ट इनिशिएटिव्हच्या ‘पराग’ या शैक्षणिक अभिनव प्रकाशनांच्या उत्तेजनासाठी निर्माण केलेल्या उपक्रमातर्फे प्रकाशित झाला आहे. म्हणूनच इतका दर्जेदार पुस्तकांचा संच अवघ्या ४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
मराठी शिकणाऱ्यांसाठी, मराठी शिकवणाऱ्यांसाठी आणि मराठीचा वापर करणाऱ्या सर्वासाठी हा पुस्तकसंच उपयुक्त आहे. भाग १, भाग २ आणि उत्तरांची पुस्तिका असा हा संच आहे. या पुस्तकांच्या पाठी पुस्तकांच्या निर्मितीच सार लिहिलेलं आहे. ते असं..
‘‘भाषा हा केवळ कथा-कादंबऱ्या-कविता लिहिणाऱ्यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते. भाषा मुळातच कच्ची राहिली, तर कोणताही विषय नीट समजणे कठीण होऊन बसते; इतर भाषा शिकतानाही खूप अडचणी येतात.
म्हणून लेखन सुधारण्यासाठी मुलांना उपयोग व्हावा आणि त्यांना मदत करणे मोठय़ांना सोपे व्हावे, अशा उद्देशाने ‘लिहावे नेटके’ हा पुस्तकांचा संच तयार केला आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून पुढच्या मुलांना ह्या पुस्तकांचा उपयोग होईलच, शिवाय इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही आपली मराठी भाषा सुधारण्यासाठी ह्या पुस्तकांचा चांगला उपयोग होऊ शकेल. ’’
वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र गेली तीस वर्षे ग्रामीण भागातील शिक्षणक्षेत्रात काम करीत आहे. ‘गाव तेथे बालवाडी’ हा त्यांचा उपक्रम. संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष निर्मला पुरंदरेंच्या मते, ‘‘बालवाडय़ा आणि छंदवर्गाच्या माध्यमातून इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही संस्था काम करते. पण केवळ पारंपरिक शिक्षण नाही तर खेळ, कला, छंद, सामाजिक उपक्रम या गोष्टींची गोडी मुलांना लावली जाते. तसंच शालेय अभ्यासाच्या प्रगतीच्या दृष्टीने वाचन, लेखन, वक्तृत्व व एकूणच अभिव्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न ह्या वर्गामध्ये होत असतो. त्यासाठीच्या शैक्षणिक साहित्याच्या गरजेतून ‘लिहावे नेटके’ या पुस्तकसंचाची निर्मिती झाली. संस्थेबाहेरच्या सर्वच मुलांना आणि पालक-शिक्षकांनाही त्याचा लाभ व्हावा म्हणून मग त्याची व्याप्ती वाढवली गेली.’’
पुस्तकसंचाच्या लेखिका आणि सादरकर्त्यां माधुरी पुरंदरे वाचकाला उद्देशून सांगतात, ‘‘स्वत:चे अनुभव लक्षात घेऊन बरीच खटपट करून मी हे पुस्तक तुझ्यासाठी तयार केले आहे. तुलाही नेहमी भाषेचा वापर करावा लागतो. शाळेतच नव्हे, तर एरव्हीही लिहावे-बोलावे लागते. ते करताना तुझ्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात, तुझा आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी तयार केलेले भाषेचे व्यायाम ह्या पुस्तकात दिलेले आहेत. हे काही फक्त व्याकरणाचे पुस्तक नाही; किंवा खरे तर ते व्याकरणाबद्दल थोडे आणि भाषेबद्दल अधिक सांगणारे आहे. भाषेबद्दलच्या झाडून सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत असे माझे बिलकुल म्हणणे नाही. शाळेत भाषेचा अभ्यास करताना ती उत्तरे तुला मिळतीलच. पण अनेकदा असे होते, की एकीकडे वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास वाढत चाललेला असतो आणि त्याच वेळी काही साध्या गोष्टी कच्च्या राहून जातात. त्या घटवून, सराव करून पक्क्या करण्यासाठी तुला या व्यायामांचा उपयोग होऊ शकेल आणि वाढत्या अभ्यासाचे वजन पेलण्यासाठी तुझी थोडी जास्त तयारी होईल.
भाषा हा केवळ कथा-कादंबऱ्या-कविता लिहिणाऱ्यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते.
हे सगळे व्यायाम ‘प्रमाण मराठी’ भाषेसाठी तयार केलेले आहेत. सर्वाना कळेल अशी मराठी आपल्याला वापरावी लागते. तिला ‘प्रमाण मराठी’ असे नाव आहे. तू शाळेत शिकत असलेली, वर्तमानपत्रातील किंवा पुस्तके-मासिकांमधील, रेडिओ-चित्रवाणीचे निवेदक बोलतात ती मराठी ‘प्रमाण’ असते.
अक्षरांशी आणि शब्दांशी खेळताना खूप मजा आली पाहिजे. मला येते. तुलाही ती यावी म्हणून हा सगळा खटाटोप केला आहे.’’
हसत-खेळत मराठी शिकवणाऱ्या अशा पुस्तकाची कमतरता होती. ती ‘लिहावे नेटके’ या अभिनव पुस्तकसंचाने भरून काढली आहे. म्हणून अशा उपक्रमांचे स्वागत करायला हवे.
लिहावे नेटके : लेखक - माधुरी पुरंदरे
प्रकाशक : ज्योत्सना प्रकाशन,
वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, पुणे
किंमत : भाग-१, भाग-२, उत्तरपुस्तिका
एकत्रित रु. ४००

तीळगूळ!

खूप र्वष झाली, पण ती मकर संक्रांत अजून त्याच्या लक्षात आहे.
असलं काही आठवलं की मन खूप खूप मागे जातं. लहानग्या मुठीएवढं चिमुकलं होतं.
छोटय़ा बाळाची दुपटी बदलण्यात गुंग झालेल्या आईला त्याच्याकडे पाहायला वेळ नव्हता, ते दिवस होते ते. रोज सकाळी तो स्वत:चा स्वत: उठे. स्वत:च आरशासमोर उभं राही. दात घासे. एखादे दिवस नाही घासले दात तरी चालत होतं. त्याच्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं ना! आज्जी खूप साय पाडून चहाचा कप पुढे करायची. सकाळी उठून ‘बॉऽऽक’ व्हायचं. आपल्याला साय आवडत नाही, हे तिला पाचशेचोवीस वेळा सांगूनही ध्यानात यायचं नाही. तेव्हा आई अवघडलेल्या अवस्थेत बाळाला मांडीवर घेऊन बसल्याजागी डुलक्या मारत असायची.
‘‘तुझी तू काढून टाक बरं ती साय! दादा ना तू आता? मग नीट वागायचं,’’ कंटाळलेल्या आवाजात आई बसल्या जागेवरून समजूत काढायची. अस्सा राग यायचा. ‘काँईऽऽऽ असा आवाज करत बारीक आवाजात बाळ रडत असे. सकाळपासून सगळं घर त्या बाळाच्या मागे धावे. मग एक मावशी यायची. ती आली की दार बंद करून आई आणि बाळाला काही तरी करायची. त्या वेळी ‘आत यायचं नाही’ असं ती मावशी डोळे वटारून सांगायची. उद्या तिला पाणी पिण्याचं भांडं फेकून मारायचं असं रोज ठरवूनही तो रोज विसरायचा! अशा वेळी त्याला भारी एकटं एकटं वाटे. बाहेरच्या खोलीत येऊन तो ओठावर ओठ घट्ट दाबून रडं आवरे. डोळे डबडबून येत. घशात भारी दुखे. झोपाळय़ाची कडी धरून तो मुकाट बसून राही.
खोलीचं दार उघडलं की एक अनामिक धुरकट वास नाकात भरे. मस्त वाटे. सारं रडं विसरून तो खोलीत धाव घेई. हसऱ्या चेहऱ्यानं आई त्याला जवळ घेई. स्वच्छ दुपटय़ात बांधलेलं बाळ मुठी चोखत हुंकार देऊ बघे. ‘बघ, तुला बोलावतोय तो!’, आई सांगे. आई झोपायची त्या पलंगाच्या खाली घमेल्यात काही तरी विस्तवासारखं घमघमत असे. त्याचाच तो धुरकट वास असायचा. तो आईच्या पदराला येई आणि बाळाच्या दुपटय़ालाही. ‘‘आई, तू कधी बरी होणार?’’, दुखऱ्या आवाजात तो विचारायचा. आई गलबलून जायची. ‘‘अरे मी बरीच आहे राजा, मला काही नाही झालेलं’’, ती सांगायची आणि पटकन त्याचा पापा घ्यायची. असा पापा तिनं घेतला की त्याला खूप आधार वाटे. तेवढय़ात बाबा येत, ‘‘काय रे गधडय़ा, बाळाशी काही उद्योग करून ठेवशील, लेका! चल, बाहेर खेळ, इथं नको टिवल्याबावल्या करूस..’’
हिरमुसला होऊन तो पुन्हा बाहेर ढकलला जाई.
एकदा आज्जी पहाटे उठून तव्यावर काहीतरी करत होती. काय करतेस? विचारलं तर म्हणाली हलवा. कशाला? विचारलं तर म्हणाली, दागिने करायला. डोंबलंटोंबलं. मग हायहुस्स करत तिनं तीळगुळाचे लाडूही वळले. मोठी माणसं एवढे छोटे लाडू करतात हे बघून त्याला हसायलाच आलं. त्यापेक्षा तो काटेदार, पांढराशुभ्र हलवा त्याला आवडला. मोत्याच्या दाण्यासारखा शुभ्र. आकाशातल्या चांदणीसारखा. लांबून पाहिला तर चमकेलसुद्धा. आज्जीनं दोन दाणे त्याच्या हातावर ठेवले. ‘खा’, म्हणाली. कुडुमकुडुम आवाज करत त्यानं ते खाल्ले. तो बेहद्द खुश झाला.
दुसऱ्या दिवशी गडबड उडाली. हलव्याचे दागिने करून बाळाला घातले गेले. मुकुट. कंबरपट्टा. मनगटय़ा. वाळे. गळय़ातलं.. एक बासरीसुद्धा होती. सगळ्या बायांनी मिळून बाळाला खूप रडवलं. बाळाचं रडं थांबता थांबेना. आईनं प्रयत्न करून पाहिला. आज्जीनं त्याची दृष्ट काढून झाली. अचानक त्याला आयडिया सुचली. गुडघ्यावर बसत, ओणवा होत, खिशात हात घालून त्यानं एक हलव्याचा दाणा काढला आणि बाळाच्या ओठांवर धरला. त्याला जीभ लावताक्षणी बाळाचं रडं थांबलं.
‘गधडय़ा घशात जाईल ना त्याच्या!’’, असं म्हणत आईनं संतापून त्याच्या पाठीत धपाटा घातला आणि त्याला बाजूला ढकललं. बाहेर झोपाळय़ावर येऊन तो हमसाहमशी रडू लागला. तेवढय़ात बाबा आले, त्यांनी त्याला उचलून घेतलं, ‘‘बाळासाहेब, म्हणून म्हणतो आम्ही फार जवळ जाऊ नका म्हणून. आपली कामं नाहीत ती. चल, डोळे पूस. बाहेर जाऊ फिरायला.’’
खूप दिवसांनी मग तो बाबांचं बोट धरून फिरायला बाहेर पडला. एका खिशात शंभराच्या वर हलव्याचे दाणे होते आणि दुसऱ्या खिशात तीळगुळाचे बारा लाडू! त्यानंतर इतक्या मकर संक्रांती आल्या आणि गेल्या. पण गोडगोड कुडुमकुडुम हलव्याची आणि तीळगुळाच्या लाडवाची ती चव त्याला इतक्या वर्षांत एकदाही चाखायला नाहीच मिळाली.

Sunday, January 2, 2011

. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा अपेक्षा घेवून आले २०११ साल. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


                                             
नूतन वर्षाभिनंदन ! 2011