Total Pageviews

Wednesday, January 18, 2012

बारा चेंडूंचे कोडे

प्रश्न-१: सारख्याच वजनाचे, आकार, प्रकार इत्यादी सर्वच बाबतीत एकदम सारखे असे आठ चेंडू आहेत. त्यांपैकी फक्त एक वजनात थोडा हलका किंवा जड आहे. तो शोधून काढायचा आहे आणि हेही शोधून काढायचे आहे की तो इतरांपेक्षा हलका आहे की जड. मात्र याकरता एक तराजू उपलब्ध आहे जो फक्त तीनदाच वापरायचा आहे. हा चेंडू व तराजू यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंचा आधार घ्यायचा नाही आहे. तर हे कसे करता येईल?

उत्तर: तराजू तीनदा वापरायचा आहे म्हणजे तीनदा तोलता येणार. पहिल्यांदा आठपैकी कुठलेही तीन चेंडू एका पारड्यात ठेवा आणि कुठलेही इतर तीन चेंडू दुसऱ्या पारड्यात ठेवा. उर्वरित दोन चेंडू खालीच असू देत.

ह्यावेळी समजा तराजूचा काटा मध्यावरच राहिला तर खाली ठेवलेल्या दोन चेंडूंपैकी कुठला तरी एक हलका किंवा जड आहे. असे असेल तर दुसऱ्या तोलण्यात तेच दोन चेंडू प्रत्येक पारड्यात एक एक असे ठेवा आणि तोला. एक पारडे खाली जाईल तर दुसरे वर. मग वर गेलेल्या पारड्यातील चेंडू काढून घेऊन त्या जागी एक प्रमाण चेंडू ठेवा. मग तोला. हे तोलणे तिसरे तोलणे असेल. पारडे वर गेल्यास पहिल्या पारड्यातील चेंडू इतरांपेक्षा जड असणार. पारडे खाली जाणारच नाही. कारण फक्त एकच चेंडू वेगळा आहे. मात्र आता पारडे बरोबरीत राहीले तर दुसऱ्या तोलण्यात वर गेलेल्या पारड्यातील चेंडू वेगळा ठरेल. हलका ठरेल.

ह्यावेळी जर एक पारडे खाली व एक पारडे वर गेले तर दोन निष्कर्ष निघतात. उरलेले दोन्ही चेंडू प्रमाण चेंडू आहेत आणि प्रथम तोललेल्या सहा चेंडूंमध्येच वेगळा चेंडू आहे. आता वर गेलेल्या पारड्यातील तीन्ही चेंडूंवर 'ह' असे तर खाली गेलेल्या पारड्यातील तीन्ही चेंडूंवर 'ज' असे (केवळ खुणेसाठी म्हणून) लिहून घ्या. अजून दोनदा तोलणे शक्य आहे.

आता दुसऱ्यांदा तोलतांना एका बाजूला दोन 'ज' लिहीलेले आणि एक 'ह' लिहीलेला चेंडू ठेवा तर दुसऱ्या बाजूला दोन प्रमाणित चेंडू व एक 'ज' लिहीलेला चेंडू ठेवा. तोला. तराजूचा काटा जर मध्यावर राहीला तर तराजूत नसलेल्या 'ह' लिहीलेल्या दोन चेंडूंपैकी एक हलका असायला हवा. त्या दोघांना तिसऱ्या तोलण्यात वेगवेगळ्या पारड्यांत ठेवून जे पारडे वर जाईल त्यातला चेंडू हलका ठरवा.

दुसऱ्यांदा तोलतांना जर दोन 'ज' लिहीलेले चेंडू असलेले पारडे खाली गेले तर त्या दोन 'ज' लिहीलेल्या चेंडूंपैकी एक जड असेल. त्यांना वेगवेगळ्या पारड्यांमध्ये घालून तिसऱ्या तोलण्यात त्यांच्यापैकी जो खाली जाईल तो चेंडू जड ठरवावा. मात्र दुसऱ्यांदा तोलतांना जर दुसरे पारडे खाली गेले तर दोन शक्यता उद्भवतात खाली गेलेल्या पारड्यातील 'ज' लिहीलेला चेंडू जड असेल किंवा पहिल्या पारड्यातील 'ह' लिहीलेला चेंडू हलका असेल. तिसऱ्या तोलण्यात पहिल्या पारड्यातील 'ह' लिहीलेला चेंडू एका पारड्यात ठेवा आणि दुसऱ्या पारड्यात एक प्रमाणित चेंडू ठेवा. प्रमाणित चेंडू असलेले पारडे वर जाणारच नाही. कारण फक्त एकच चेंडू वेगळा आहे. प्रमाणित चेंडू असलेले पारडे खाली गेल्यास तिसऱ्यांदा तोलतांना पहिल्या पारड्यात ठेवलेला 'ह' लिहीलेला चेंडू हलका असल्याचे सिद्ध होईल. मात्र यावेळी जर तराजूचा काटा मध्यावरच राहीला तर दुसऱ्यांदा तोलतांना खाली गेलेल्या पारड्यातील 'ज' लिहीलेला चेंडू जड असेल.

म्हणजे मी प्रश्नही सांगितला आणि उत्तरही दिले. मग मजा ती काय राहिली? राहिली आहे तर! आता खालचा प्रश्न सोडवा.

प्रश्न-२: सारख्याच वजनाचे, आकार, प्रकार इत्यादी सर्वच बाबतीत एकदम सारखे असे बारा चेंडू आहेत. त्यांपैकी फक्त एक वजनात थोडा हलका किंवा जड आहे. तो शोधून काढायचा आहे. मात्र याकरता एक साधा तराजू उपलब्ध आहे जो फक्त तीनदाच वापरायचा आहे. आणि या चेंडू व तराजूव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंचा आधार घ्यायचा नाही आहे. तर हे कसे करता येईल?

Saturday, December 24, 2011

शिशु शिक्षणाचा बोबड उद्योग

आपल्या तीन-चार वर्षांच्या चिमुकल्याने आयुष्यात प्रगती करावी असे वाटत असेल तर पालकांनी आधी त्याला स्वत:ची घसेफोड करून ‘एबीसीडी’ किंवा ‘वन-टू-थ्री’ शिकविणे थांबवावे. हे शिकवायला शाळा आहेत. त्याऐवजी पालकांनी शब्दसंग्रह वाढण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना गोष्टी वाचून दाखवाव्या. घराबाहेर अंगणात, बागेत, पाणी, चिखल, वाळू, झोपाळा यांच्याशी मनसोक्त खेळू द्यावे. कणिक, वॉटरकलर्स, फिंगर पेन्ट अगदी शेव्हींग क्रीमनेही मुलं चांगल्या पद्धतीने खेळतात. म्हणजेच काय त्यांच्या अभिव्यक्तीत व्यत्यय न आणता तुम्ही त्यांना मनसोक्त खेळू द्या - अमेरिकेतल्या जुडी आणि टोनी प्रिव्हेट नामक एका अवलिया दांपत्याने संपादीत केलेल्या ‘व्हॉट अमेरिकन्स टिचर्स विश पेरेन्ट्स न्यू’ नामक पुस्तकात एका किंडरगार्डन शिक्षिकेने हा सल्ला पालकांना देऊ केला आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांना त्यांच्या शिक्षकांना कोणती एक गोष्ट सांगावीशी वाटते, या ‘थीम’वर प्रिव्हेट दांपत्याने या प्रतिक्रिया मागविल्या होत्या. पण, मोजक्याच शब्दातील शिक्षकांच्या थेट आणि बिनधास्त सूचना जगातील समस्त पालकवर्गाच्या डोळ्यात जळजळीत अंजन टाकणाऱ्या आहेत.
आजकालचे पालक आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी जागरूक आहेत. पण, कधीकधी हा जागरूकपणा ‘अतिपणा’कडे झुकू लागतो आणि मुलं आणि पालक या दोघांचंही कसं कठीण बनून जातं, यावर या पुस्तकातील शिक्षकांच्या तिखट प्रतिक्रियांनी चांगलाच प्रकाश पडतो. आपल्या मुलांना अकाली ‘शिक्षित’ करण्याच्या या गडबडीत पालकांचा खिसा रिकामा होतो आणि मुलांचं बालपण. पालकांचं होणारं नुकसान भौतिक स्वरूपाचं असतं. पण, आपल्या अपेक्षांचे ओझं मुलांवर लादून त्यांना लवकरात लवकर ‘शिकती’ करण्याच्या पालकांच्या भूमिकेमुळे मुलांची बौद्धिक, मानसिक, भावनिक, शारीरिक अशी चोहोबाजूंनीच कोंडी होत असते.

Monday, October 10, 2011

टीव्हीच्या अतिरेकामुळे लहान मुलांच्या मनावर आणि शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांची कितीही चर्चा होत असली  तरी  टीव्हीवेड काही कमी होताना दिसत नाही. गेल्याच आठवडय़ात हार्वर्ड विद्यापीठाच्या अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षांत दररोज दोन तासांहून अधिक काळ टीव्ही बघत राहिल्याने मधुमेह आणि हृदयविकार निर्माण होतात. अमेरिकन ‘अ‍ॅकेडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स काऊन्सिल’ने नव्या अहवालाद्वारे टीव्ही केवळ शारीरिक हालचालीच कमी करीत नाही, तर खाद्यपदार्थाच्या जाहिराती मुलांच्या खाण्याच्या सवयी बिघडवू शकतात, असा इशारा दिला आहे.लहान मुलांमधील स्थूलत्त्व, ड्रग्ज, िहसक, गुन्हेगारी वृत्ती, अभ्यासातील पीछेहाट या सर्वाना टीव्ही जबाबदार असल्याचे  ‘अ‍ॅकेडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक्स काऊन्सिल’ने अहवालात म्हटले आहे. अमेरिकी व्यक्ती साधारण पाच तास टीव्ही पाहते. मात्र जगभरातील लहान मुले मोठय़ा माणसांहून दोन तास अधिक टीव्ही पाहातात, असे समोर आले आहे.   

Friday, July 8, 2011

शाळा!

त्याला वाटलं, अजून थोडं झोपून राहावं. थोडंसंच. दहा मिण्टं. डोळेही न उघडता तो पोटावर आणखी पसरला. पांघरुण घट्ट ओढून घेत आणखी थोडी ऊब गोळा केली. अर्धवट झोप आणि अर्धवट जाग यांच्या कुंपणावरच सोसाटय़ाचा वारा यावा, तसा विचार त्याच्या मनात घुसला- आज शाळेचा पहिला दिवस.. श्शी!
पांघरुणातल्या पांघरुणात तो उदास होत गेला आणि त्या औदासीन्यानं त्याला झोपेतून बळेच ओढून काढलं. तेवढय़ात आई आलीच उठवायला.
‘‘उठतोयस नं रे.. शाळेत जायचंय आज!’’ आईनं घेतलेली पापी आज खूप गोड वाटली नाही. खांदा हिसडून तो अंथरुणात अधिकच मुरला. आई आणखी एक-दोन पाप्या घेऊन दोन-चार मिनिटं झोपू देईल. मग मात्र..
दात घासायला ब्रशवर टूथपेस्ट देऊन आई स्वैपाकघरात गेली. दात घासणं थांबवून तो आरशात खुळ्यासारखा पाहात राहिला. एक किडमिडीत बुटका मुलगा त्याच्याकडे झोपाळू नजरेनं बघत होता.
येडा आहेस येडा! बघतो काय असा डुक्करसारखा? शाळेत जा गुपचूप..!! मनातल्या मनात तो ओरडला. तोंडं वेडीवाकडी करून पाहिली. टूथपेस्टचा भरपूर फेस येऊनही आज दात घासताना मजाच नाही आली! डोळ्यातली चिपाडं काढण्याचा प्रयत्न मग त्यानं केलाच नाही. तेवढय़ात घाईनं आलेल्या आईनं भराभरा त्याचा चेहरा स्वच्छ धुतला. नाक शिंकरून घेतलं. भराभरा त्याचे कपडे काढून टाकत ऊन ऊन पाणी त्याच्या अंगावर ओतलं. साबणाचा सुगंध त्याला एरवी जाम आवडतो. आज नेमका तो डोळ्यात गेला. हातातल्या प्लास्टिकच्या मगाने त्यानं आईलाच मारायचा क्षीण प्रयत्न केला. डोळ्यात झोंबत होतं, आणि मनात प्रच्चंड चीड आली होती. न्हाणीघराच्या दरवाजात अध्र्या चड्डीत शिट्टय़ा मारत हसत उभ्या असलेल्या बाबाला बघून तर त्याचं डोकंच सटकलं. या दोघांनाही बेडूक केलं पायजे!
टॉवेलात गुंडाळून खसाखसा पुसत त्याला पुन्हा आरशासमोर आणण्यात आलं. इस्त्री केलेला नवाकोरा युनिफॉर्म अंगावर चढवताना खरं तर त्याला छान वाटलं होतं, पण रागामुळे तसं काही त्यानं दाखवलं नाही. ‘‘पहिलाच दिवस आहे आज.. लौकर सोडतील!’’ त्याचा भांग पाडत आईनं समजूत काढली, ‘‘बाबा थांबेल बाहेर तोवर. काळजी करू नकोस. पण झालीच दिवसभर शाळा तर रडत बसायचं नाही. डब्यात छान खाऊ देतेय तुला. कळलं का शंभ्या!’’
आई असं बोलायला लागली की का कुणास ठाऊक, ओठ बाहेर बाहेर येतो. श्वास जोरात येऊन हुंदकाच येतो. खरं तर रडू येत नसतं. पण मग असं का होतं? गटागटा दूध पिऊन तो निघणार होता. पण त्याला दूध अजिबात आवडलं नाही. मळमळत होतं, रडवेल्या सुरात त्यानं आईला विचारलं, ‘‘आई मला शाळेत ओकी होईल?’’
‘‘छे रे, ओकी कशानी होईल? पावसाळी हवा आहे नं. म्हणून वाटतंय तुला असं!’’, आईनं पुन्हा समजूत घातली.
दफ्तर पाठीला अडकवून तो निघाला तेव्हा पाऊस नुकताच पडून गेला होता. रस्ते ओले होते. मोटारींचे हॉर्न नेहमीपेक्षा मोठय़ांदा वाजत होते. बाबाचा रेनकोट घट्ट पकडून तो बाईकवर बसला.
शाळेसमोर खूप छत्र्या आणि खूप रेनकोट होते. रंगीबेरंगी गर्दी. खूपच गोंगाट होता. शाळेचा शिपाई एकेका मुलाला गेटमधून आत सोडत होता. बाबाचं बोट धरून तो बावळटासारखा बघत राहिला.
‘‘काय साहेब, जायचं का वर्गात?’’ त्याच्या डोक्यावर नाजूकशी टप्पल बसली, म्हणून त्यानं मान मागे टाकत वर पाहिलं. सुंदर हसत बाई त्याच्याकडे होत्या. बाबाशी ओळखी ओळखीचं बोलत त्या म्हणाल्या, ‘‘डोण्ट वरी. आम्ही खूप मज्जा करणार आहोत शाळेत. हो की नाही रे!’’
मान डोलवावी, की न डोलवावी, या संभ्रमात असतानाच बाईंच बोट पकडून तो आत कधी गेला ते त्यालाही कळलं नाही. गेला तो चक्क रमलाच!
बाईंचं ते बोट मग बरीच र्वष सुटलंच नाही. खरं तर अजूनही नाही सुटलेलं!

Saturday, April 16, 2011

प्रार्थना कशासाठी करावी.

प्रार्थनेत मागताना अशा गोष्टी मागा की ज्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही डॉक्टर व्हावे म्हणून जर प्रार्थना केलीत आणि तुम्ही आंधळे असाल किंवा पॅरालिटिक असाल तर तुम्ही तेथे जाऊन पोहोचणारच नाही. अर्थात त्या क्षेत्राशी संबंधित कार्य करण्याची संधी तुम्हाला नक्की मिळू शकेल.
तुम्ही आर्टसचे स्टुडन्ट असाल आणि वैज्ञानिक व्हायची इच्छा कराल तर तुम्हाला एखाद्या वैज्ञानिक संशोधन केंद्रात नोकरी नक्की मिळेल. प्रार्थना तुम्हाला इच्छेच्या जवळपास नक्की नेऊन पोहचवेल, परंतु जर तुम्हाला पूर्ण यश हवे असेल तर त्या गोष्टीची अपेक्षा करा की, ज्या गोष्टीसाठी तुमची मानसिक आणि शारीरिक क्षमता असेल. आर्थिक क्षमता तुम्हाला प्रार्थना प्रदान करेल.
तुमचा शैक्षणिक प्रवास एका क्षेत्रातील असेल व तुमचे ध्येय दुसऱ्या क्षेत्रातील असेल व प्रार्थना करण्याची तुमची चिकाटी व ध्येयापर्यंत जाण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची तुमची तयारी असेल तर प्रार्थना तुम्हाला अनेक मार्ग उपलब्ध करून देईल.

Thursday, April 14, 2011

शिबीर!

लहानपणाची एक आठवण त्याच्या स्मरणात अजून आहे. कधी ती अंधूक आठवते. कधी ठळक स्पष्ट डोळय़ांना दिसते. हे गौडबंगाल त्याला काही कळत नाही. तेव्हा तो काही फार लहानगा नव्हता. असेल बारा नाही तर तेराचा.. दूर कुठल्यातरी प्रदेशात होणाऱ्या शिबिराला त्याला पाठवा, असं एक ओळखीचे काका सांगून सायकलवर टांग टाकून निघून गेले, आणि ते सगळं सुरू झालं..
‘‘इतक्या लांब कुठे पाठवणार? किती लहान आहे तो.. तुझं आपलं काहीतरीच!’’, बाबांनी आईला पहिल्यांदा उडवूनच लावलं, ‘‘ हे कॅम्प वगैरे भंकसबाजी असते सगळी.. पैसे काढायची लाइन! तुमची पोरं पाठवा, वर हजारो रुपये पण आमच्या बोडख्यावर ओता. हज्जारो रुपये घेऊन हे आमच्या पोरांना तंबूत झोपवणार, आणि बटाटय़ाची भाजी नि तेलकट पुऱ्या खायला घालणार! मरो तो कॅम्प आणि ट्रिप. इथेच घाल कुठल्या तरी क्रिकेट शिबिरात!’’
आई दुग्ध्यात पडली. पाठवावं की राहू दे यंदा? आजवर कधी आईला सोडून फारसा राहिलेला नाही. क्वचित कधी आज्जीआजोबांबरोबर दोनेक दिवस राहिला तर. पण बाकी हे पोर अंगाखांद्यावरच आहे अजून. पण असं किती दिवस राहणार? कॅम्पमध्ये गेला तर चारचौघांत राहून काही जगरहाटीचा अंदाज येईल. उघडय़ावरचे खेळ खेळून थोडा कणखर होईल. ती पंजाबी नि गुजराथ्यांची मुलं कशी चलाख असतात. कॅम्पला जातील. स्पर्धामध्ये उतरतील. क्रिकेट शिबीर. नाटय़शिबीर. गाणी. नाच.. नटतील. मुरडतील. सगळं करतील. आपलीच मुलं अशी मागे राहतात.
कॅम्पला त्याला पाठवायचंच. फायदा नाही झाला तर नाही झाला, नुकसान तर काहीच नाही, पैशाचं सोडलं तर.. असा कौल आईनं दिल्यावर अचानक बाबा कॅम्प चांगला असतो, धम्माल येते वगैरे बोलायला लागला! त्याला आश्चर्यच वाटलं. कॅम्प म्हणजे एक ट्रिप असते. ट्रेननं लांब जायचं आणि तिथे भरपूर चालायचं. खेळायचं. गाणीबिणी म्हणायची. मुख्य म्हणजे आपलं सगळं एकटय़ानं करायचं. आपली बॅग सांभाळायची. रोजचे कपडे त्यात स्वत: घडय़ा घालून ठेवायचे. पांघरूण लाथाडून तसंच उठायचं नाही. उठायची वेळ झाली की इमानदारीने उठायचं. स्वत:च्या टूथब्रशवर स्वत: टूथपेस्ट लावायची! भरपूर दूध घातलेल्या चहात बुडवायला क्रीम बिस्किटं नसली तरी ओरडायचं नसतं तिथे.
खूप चालायचं रोज. खेळ खेळायचे.. इट्स ओके. जायला काही हरकत नाही, असं त्याला वाटलं. बाबांनी पण मस्त वर्णनं करून कॅम्पमधल्या मजा मजा आधीच सांगून टाकल्या होत्या. आई मात्र गप्प होती.
रेल्वे स्टेशनात कॅप घातलेले एक काका हातात कागद घेऊन पेनानं काही खुणा करत उभे होते. बाबांनी त्यांना ‘हाय’ केलं. त्यांनीही ‘नमस्कार’ म्हणत याच्या डोक्यावर टप्पल मारली. ‘‘झाली का तयारी, चिरंजीव? जायचं ना?’’ त्यानं मान डोलावली. त्यावर ते काका म्हणाले, ‘‘ हो काय हो? तुझी बॅग आधी घे पाहू बाबांकडून! इथून पुन्हा परतेपर्यंत तुझी तूच सांभाळायचीस, चालेल?’’ त्यानं परत मान डोलावली. इतर मुलं आपल्या आई-बाबांबरोबर येत होती. काकांना भेटून घाईघाईनं पुढे डब्याकडे जात होती. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून बाबांनी त्या काकांना बऱ्यापैकी पिडल्यावर ते डब्याकडे आले. डब्याच्या दरवाजाचा तो उंच पिवळा दांडा धरून तो तीन पायऱ्या चढून आत गेला..
..हिरवळीच्या सुंदर उतारावरचे काही तंबू. दूरवर दिसणारे निळेनिळे डोंगर. थोडय़ाशा अंतरावर खालच्या बाजूला खळाळत वाहणारी चिमुकली नदी. काही झोपडय़ा. माळावर चरणारी गायीगुरं. तंबूतंबूतून येणारे खिदळण्याचे ओरडण्याचे आवाज. एका तंबूबाहेर पेटलेलं चुलाण आणि त्यावर बनणारा शिरा. त्याला वाटलं, आपण या घटकेला ग्रीटिंगकार्डातच राहतो आहोत! मस्त सीनसीनरीचं ग्रीटिंगकार्ड. जिथं कितीही भांडणं झाली तरी रुसायला होत नाही. कितीही चाललं, मस्ती केली तरी दमायला होत नाही. कितीही खाल्लं तरी पोट काही भरत नाही. एरवी ‘यकी’ लागणारा उपमा इथे किती टॉप लागतो. मित्रांबरोबर धमाल करत राहण्यातच खरी मजा आहे.. तो परत आला. आईबाबांना भेटला, तेव्हा त्याला त्यांना पाच हजार पाचशे बेचाळीस गोष्टी सांगायच्या होत्या. आणि हो, त्यानंतर त्यानं चहा पिणंही सोडलं आपोआप.
त्या कॅम्पमध्ये त्याची स्वत:चीच स्वत:शी चांगली मैत्री झाली.
आता तो दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचे कॅम्प्स नेतो. रेल्वे स्टेशनावर कॅप घालून हातात कागद घेऊन लहानग्यांना विचारतो, ‘‘झाली का तयारी, चिरंजीव? जायचं ना?’’

Tuesday, March 1, 2011

बदलत्या जीवनशैलीतही योगाभ्यास उपयुक्‍त

योग अभ्यासाने शारीरिक आणि मानसिक पातळीवर उत्तमरीत्या समतोल राधल्यास निरोगी व्यक्‍तिमत्त्व लाभते, हे आता पटू लागल्याने योगाभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. योगविद्या परदेशात लोकप्रिय होत असल्याने भारतीयांनाही आता त्याचे महत्त्व पटू लागले आहे.
विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच योगाभ्यास उपयुक्‍त ठरत असल्याने, परीक्षा, घरगुती समस्या, आणीबाणीच्या प्रसंगी योग करणारी व्यक्‍ती एकदम टोकाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घेते. शरीरातील सर्व यंत्रणा सुरळीत होत असल्याने तसेच प्रत्येक अवयवाला व्यायाम लाभल्याने रक्‍तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून दिवसभर उत्साह टिकून राहतो.

आजकाल कामाच्या गरजेनुसार सतत बसल्याने अंगदुखी, पाठदुखीसारखे विकार उद्‌भवतात. शरीराची हालचाल कमी होते. अशा वेळी योगासने केल्यास शरीर तंदुरुस्तीबरोबर मन:शांती लाभते. समाधानी वृत्ती वाढते.

सूर्यनमस्कारामुळे तर सांध्याचे विकार जवळदेखील फिरकत नाहीत. योगासनाला परस्परपूरक असलेल्या प्राणवायूमुळे आजूबाजूच्या हवेत, वातावरणात कितीही बदल झाला तरीही सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार होत नाहीत. प्रतिकारशक्‍ती वाढते. मानवी शरीरातील चक्रे आणि ग्रंथी या निद्रित अवस्थेत असतात. योगासनांमुळे त्या जागृत होता. कामाच्या व्यापात शरीर कमालीचे बेशिस्त बनते. योगामुळे सर्व क्रिया या वेळेत पार पडत असल्याने आपोआपच जीवनात शिस्तबद्धता येते.

शरीराला प्रामुख्याने सात्त्विक आहाराची गरज असते. पण तसे न होता- विशेषत: तरुण मुलांकडून काहीही खाण्याचे प्रमाण वाढत आहे. खाण्याच्या अनियमित वेळा आणि व्यसनांमुळे शरीराचा समतोलच बिघडून जातो. अशा वेळी नियमित योगासने केल्याने भोग आणि योग एकत्र राहूच शकत नाहीत. या उक्‍तीप्रमाणे व्यसनमुक्‍ती मिळू शकते आणि पचनक्रियाही योग्य रीतीने कार्यान्वित होते. अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी लठ्ठपणाने ग्रासलेले दिसते. अशा वेळी योगाभ्यासाने शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा व्यायाम मिळाल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

"सहजता, समज आणि सातत्य' या त्रिसूत्रीनुसार योगाचे कार्य चालते. धावपळीच्या जीवनात माणसाची उडणारी त्रेधातिरपिट पाहता, तंदुरुस्त मन आणि
शरीरासाठी योगाभ्यासाची नितांत गरज वाटते.